उरण तालुक्यातील जासई येथील दास्तानफाटा आणि नवघर येथील १६ जानेवारी १९८४ रोजी आपल्या न्याय्य हक्कासाठी सरकार विरोधात झालेल्या गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी आंदोलनातील गोळीबारात चिर्ले येथील नामदेव शंकर घरत, धुतूम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर हे हुतात्मे झाले होते. या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्याचा ४२ वा स्मृतीदिन महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने जासई येथे साजरा करण्यात आला. यावेळी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठनेत जे.एम. म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह मान्यवरांनी शुक्रवारी अभिवादन केले.