अरबी समुद्रात उत्तरेकडील वाढत्या थंड वादळी वाऱ्यांची लहर सुरू झाल्याने उरणसह पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमारांवर गंभीर संकट ओढावले आहे. गारठलेल्या खोल समुद्रात मासळी मिळेनाशी झाल्याने मत्स्यदुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून सुमारे ३०० हून अधिक मच्छीमार बोटी मासळीविनाच माघारी परतल्या आहेत. या परिस्थितीमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या उरणजवळील करंजा बंदरात सुमारे ३०० मासेमारी बोटी नांगरून उभ्या आहेत. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठी एका बोटीला सहा दिवसांच्या ट्रिपसाठी प्रचंड खर्च करावा लागतो.