हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज कोकण विभागात एक अभूतपूर्व इतिहास रचला गेला. कोकण विभागातील 20 हजार शाळांमधील तब्बल 51 लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद-दी-चादर’ हे गीत सादर केले. या ऐतिहासिक उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डने घेतली असून, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आगामी 28 फेब्रुवारी आणि 01 मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे.