रोहा: अजित दादांचा रायगड जिल्ह्याचा शेवटचा संवादही स्मरणात; नागोठणेचा दौरा ठरला अखेरचा
Roha, Raigad | Jan 29, 2026 महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने राज्यासह रायगड जिल्हाही शोकसागरात बुडाला आहे. सहकारातून सत्तेपर्यंतचा झंझावाती प्रवास करणारे अजित पवार यांचा रायगड जिल्ह्यातील शेवटचा राजकीय संवाद आज अनेकांच्या स्मरणात घर करून राहिला आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. या प्रवेश सोहळ्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अजित पवार नागोठणे येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. विकास, प्रशासन आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेले त्यांचे भाषण, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि स्पष्ट राजकीय भूमिका हीच त्यांच्या रायगडमधील अखेरची उपस्थिती ठरली.