
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय अखेर शासनाकडे हस्तांतरित; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय
प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय सर्व स्थावर व जंगम मालमत्तेसह कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 10 जून 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
सन 1983 पासून विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत असलेल्या या महाविद्यालयाच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी धाराशिव यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर तज्ज्ञ समितीची नियुक्ती करून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला. मंत्रिमंडळाने 5 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत या हस्तांतरणास मंजुरी दिली.
शासन निर्णयानुसार महाविद्यालयाची 7.13 हेक्टर जागा, इमारती व सर्व साहित्य विनामोबदला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच AICTE मानकांनुसार 300 प्रवेशक्षमतेसाठी एकूण 118 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र, सध्या कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळणार नसून ते मंदिर संस्थानचेच कर्मचारी राहणार आहेत. त्यांच्या वेतन, निवृत्तीवेतन व इतर सेवा लाभांची जबाबदारी संस्थानावरच राहणार आहे. भविष्यात रिक्त होणारी पदे शासनाच्या नियमानुसार भरली जाणार आहेत.
हस्तांतरणानंतर महाविद्यालयाचे नाव "श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर" असे करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या मालमत्ता हस्तांतरण, न्यायालयीन प्रकरणे, प्रलंबित देणी व इतर बाबींसाठी शासन आणि मंदिर संस्थान यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार आहे.
शासनाने संस्थानला पुढील सहा महिन्यांत इमारतींची दुरुस्ती, प्रयोगशाळा उपकरणे, ग्रंथालय साहित्य, विद्युत व्यवस्था तसेच प्रलंबित वेतन देयकांसह विविध कामांसाठी सुमारे 41.38 कोटी रुपयांचा खर्च करण्याचे बंधन घातले आहे. या खर्चाची संपूर्ण जबाबदारी संस्थानावर राहणार आहे.
याशिवाय महाविद्यालयातील सध्या प्रलंबित असलेल्या 56 न्यायालयीन प्रकरणांमधून उद्भवणाऱ्या आर्थिक दायित्वाची जबाबदारीही संस्थानावरच राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
'विकसित महाराष्ट्र 2047' या संकल्पनेनुसार महाविद्यालयात Artificial Intelligence, Data Science, Cyber Security, Green Technology, Renewable Energy आणि EV Technology यांसारखे आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
या निर्णयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून तुळजापूरच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
#Tuljapur #EngineeringCollege #GovernmentEngineeringCollege #Tuljabhavani #Osmanabad #Dharashiv #HigherEducation #MaharashtraGovernment #TechnicalEducation #VeerMaharashtraNews #TuljapurNews #EducationNews #Marathwada #AICTE #EngineeringStudents