कोकणला थेट मुंबई-ठाण्याशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी करंजा-रेवस सागरी मार्गावरील 'रो-रो' सेवेचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून पलायन केल्यामुळे हा ३४ कोटी रुपयांचा प्रकल्प अडचणीत आला आहे. मुंबई सागरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता मनिष मेतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता हे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेनंतर वर्षभराच्या कालावधीत रखडलेल्या करंजा-रेवस रो-रो सेवेचे काम पूर्ण होईल आणि ही सेवा प्रवाशांसाठी खुली होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.