कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीअंतर्गत कुरकुलवाडी वस्तीत किरकोळ भांडणाच्या रागातून शेजारणीने अडीच वर्षांच्या बालकाचा गळा दाबून जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरलाय. शेजाऱ्याची मुले माझ्या मुलांना मारतात म्हणून रागाच्या भरात हे पाऊल उचलल्याची कबुली आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिने पोलिसांसमोर दिली आहे. या प्रकरणात मृत चिमुकल्याचे नाव जयदीप गणेश वाघ असे असून, त्याच्या अचानक मृत्यूला सुरुवातीला नैसर्गिक कारणांचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र नेरळ पोलिसांनी तपासाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी जयवंताला अटक करण्यात आली असून, तिला 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.